मंदिर परिसरातील दर्शनिय स्थळे 

<< मागे    

श्री बाळाभाऊ महाराज व श्री नारायण महाराज यांचे समाधि मंदिर :-

मागील बाजूस श्रींचे दोन नि:स्पृह सेवक श्री बाळाभाऊ महाराज व श्री नारायण महाराज या दोघांचे समाधि मंदिर आहे. 

 

 

 

 

सेवाधारी श्री बाळाभाऊ महाराज

श्री गजानन महाराजांच्या शिष्यपरिवारामध्ये बाळाभाऊंची गणना सर्वश्रेष्ठ शिष्य म्हणून होते. महाराजांच्या शिष्यांमध्ये सुशिक्षित व जिज्ञासू असे शिष्य म्हणजे बाळाभाऊ होत. बाळाभाऊ म्हणजे समर्पणाचा मूर्तिमंत दाखला. कोणत्याही प्रकारची शंका, कुशंका, परीक्षा, चमत्कार, ज्ञान याने संशयग्रस्त न होता केलेले बावनकशी समर्पण. अद्वितीय गुरुभक्तीचा आदर्श. सुसंस्कृत, सुसंस्कारित आणि सुशिक्षीत अशा सी.के.पी. कुटुंबात बाळाभाऊ प्रभू यांचा जन्म झाला. बालपणापासूनच कुटुंबातील संस्कारांचा वारसा लाभला असल्याने त्यांची वृत्ती धार्मिक होती. त्यांना देवदर्शनाची आवड होती. शिक्षण घेवून ते नोकरीस लागले तेही चांगल्या पदावर. मुंबईला जी.पी.ओ.(जनरल पोस्ट ऑफीस) मध्ये ते तारमास्तर होते.

मुंबईसारख्या मोठ्या शहरात असूनही त्यांनी आपले धार्मिक जीवन टिकवून ठेवले होते. तेथील समुद्रकाठी असलेल्या महालक्ष्मी मंदिरात आणि कांदेवाडी येथील स्वामीसूत यांच्या श्रीस्वामी समर्थ मठात ते दररोज जात असत. नोकरीव्यतिरिक्त त्यांचा जास्तीत जास्त काळ देवदर्शन, नामस्मरण व ग्रंथवाचन यामध्येच जात असे. बाळाभाऊंचे मामा आत्मारामपंत भिकाजी सावजी हे अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयात उच्च-प्रांतिक अधिकारी होते. बाळाभाऊ आपल्या मामांकडे अधून-मधून येत असत. आत्मारामपंत श्री गजानन महाराजांचे भक्त होते. कुळाचाराप्रमाणे त्यांच्या घरी नवरात्रोत्सव पूजन होत असे. बाळाभाऊ या कार्यक्रमासाठी सुट्टी काढून येत असत.

महाराजांनी समाधी घेतल्यानंतर बाळाभाऊ नेहमी महाराजांच्या देहविसर्जन स्थळाजवळच बसत असत. तेथे ते गीतेवर प्रवचन करीत असत. महाराजांनी दिलेल्या शक्तीच्या साहाय्याने भक्तांचे दु:ख निवारण करीत असत. महाराजांनी समाधि पश्चात बाळाभाऊ कृश होत गेले. व त्यांचा विरह सहन न झाल्यामुळे दोनच वर्षानी, १९१२ साली वैशाख वद्य षष्ठीस बाळाभाऊ देह सोडून श्री गजानन महाराजांच्या चरणी कायमचे स्थिर झाले.

सेवाधारी श्री नारायण महाराज
नांदुरा येथील फुलमाळी समाजाचे महादुजी देवकर आणि देवकाबाई हे उभयता शंकराचे निस्सीम उपासक होते. या गरीब कुटुंबात नारायणांचा जन्म झाला. नारायण बालपणापासूनच शांत व धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना भजनाचा, पोथीपुराणे ऐकण्याचा नाद होता. ते राना-वनांत फिरत असत किंवा निवांतपणे भजन व नामस्मरण करीत बसत. गावात भिक्षा मागून गोळा केलेले अन्न ते कधी-कधी गरिबांमध्ये वाटूनही देत. त्यांना गोर-गरिबांविषयी विलक्षण प्रेम होते. नारायणांच्या या क्रिया पाहून गावातील लोक त्यांना वेडा समजत असत. त्यांचे मोठेपण मात्र लोकांना कळू शकले नाही.

खामगांवजवळ वाघोली येथे बारा वर्षे त्यांनी श्री हनुमंताची उपासना व तपश्चर्या केली. त्यानंतर भुसावळ तालुक्यातील उधळी या पहाडी प्रदेशात शिवउपासना करून योग प्राप्त केला. त्या ठिकाणी असलेल्या साधुपुरूषांना ते नेहमी म्हणत, ‘‘माझ्या अंत:करणात पैशाविषयी, धनाविषयी कसलेही प्रेम नाही." त्या भागातील त्यांचे चमत्कार त्यांच्या गावातील गजाधर या ब्राह्मणास समजल्यावर त्याने उधळी येथे जाऊन त्यांचे दर्शन घेतले व नांदुरा येथे आपल्या घरी परत यावे अशी त्यांना विनंती केली. गजाधराच्या आग्रहाने नारायण पुन्हा एकदा आपल्या गावी आले. त्यांना घरी आल्याचे पाहून सर्वांनाच आनंद झाला.

वैशाख वद्य षष्ठीस जेव्हा बाळाभाऊ महाराजांनी समाधी घेतली तेव्हा नारायण महाराज नांदुरा येथे होते. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात जावून श्री गजानन महाराजांनी सांगितले की, ‘‘ नारायण ! आता तू भाविक भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी शेगांवला जा!" सद्गुरूंचा आदेश मान्य करून ते शेगांव येथे आले व त्यांनी बाळाभाऊ महाराजानंतर काही दिवस महाराजांची आज्ञा पालन केली. श्री गजानन महाराजांचे थोर सेवाधारी नारायण महाराज यांनी शेगांव येथे चैत्र शुध्द षष्ठीच्या दिवशी भक्तांना पूर्व कल्पना देऊन शके १८५८, २७/०३/१९३६ मध्ये श्री गजानन महाराजांच्या चरणी समाधी घेतली.