श्रींचा कार्यउपदेश (अमृतवाणी)
 
श्रींचा कार्यउपदेश (अमृतवाणी)      श्रींचा स्पर्श झालेला पवित्र ठेवा
 

अध्याय पहिला

अन्न भक्षिले देहानीं । म्हणून त्या पाहिजे पाणी । हा व्यवहार चतुरांनी । अवश्य पाहिजे जाणिला ।।१३०।।

अध्याय दुसरा

हें नाणें तुमचें व्यवहारी । मला न त्याची जरुरी । भावभक्ति नाण्यावरी । संतुष्ट मी रहातसे ।।५०।।

जें जें जयानें सांगावे । तें तें त्यानें आचरावें। शब्दच्छलासीं न करावें । साधकाने केव्हांही ।।६५।।

अध्याय चौथा

जा वेळ करूं नको। उगीच सबबी सांगू नको । गुरुपाशीं बोलू नको। खोटे वेड्या यत्किंचित् ।।८३।।

अशाश्वताचें पोषण । केलें शाश्वता विसरून । त्या कर्माची तुजलागून । फळें भोगणें भाग असे ।।११७।।
ती फळें भोगल्याविना। सुटका तुझी होईना । दे हा टाकून हट्टीपणा । विवेक कांहीं करी मनी।।११८।।

असो एक्या समयीं भली । समर्थांसी इच्छा झाली । ती त्यांनी निवेदिली ।। आपल्या शिष्यवर्गातें ।।१४३।।
वैदिक ब्राम्हण बोलवा । मंत्र जागर येथें करवा । वेदश्रवणे देवदेवा ।। आनंद होतो अतिशय ।।१४४।।

अध्याय ५ वा

पुण्य पाणी पाजण्याचें । आहे बापा थोर साचें। पाण्यावाचून प्राणाचे । रक्षण होणे अशक्य ।।९७।।

अध्याय ६ वा

संतत्व नाहीं मठांत। संतत्व नाही विद्वत्तेत। संतत्व नाही कवित्वांत । तेथें स्वानुभव पाहिजे ।।८४।।

कर्म मार्ग सोडूं नको । विधी निरर्थक मानूं नको । मात्र त्यांत होऊं नको । लिप्त बाळा केव्हांही ।।११९।।
आचरून कर्म फल । टाकितां भेटतो घननीळ । त्याच्या अंगीं न लागे मळ । या कर्माचा केव्हांही।।१२०।।

अध्याय ७ वा
पहिली संपत्ति शरीर । दुसरें तें घरदार । तिसरीचा तो प्रकार । आहे धनमानाचा ।।५७।।

अध्याय ८ वा

ज्यांनी राख लावावी । त्यांनी उपाधी दूर ठेवावी । अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ।।१४७।।
नुसते शब्दपांडित्य । माजलें जगीं अतोनात । तेणेंच आहे झाला घात । आपुल्या या संस्कृतीचा ।।१४८।।

अध्याय ९ वा

ब्राह्मणाचें भाषण । कदा नसावे अप्रमाण । या  तत्त्वालागून । न जाणती चांडाळ ते ।।७३।।
व्दिजे निजधर्म सोडिला । आचार विचार सांडिला । ह्यामुळें श्रेष्ठत्वाला । ते मुकलें सांप्रत।।७४।।
बोलण्यात पाहिजे मेळ । चित्त असावे निर्मळ। तरीच तो घननीळ । कृपा करितो भास्करा ।।७६।।

अध्याय १० वा

महाराज वदले अखेर। गणेश आप्पाचा धरून कर । तुझें किती आहे सदन दूर । तेवढें सांग मला ? ।।२९।।
तुझ्या सदनीं वाटतें यावें । कांही वेळ बसावें । अरे चित्ती असेल ते बोलावे । भीड न धरितां कवणाची।।३०।।

अध्याय ११ वा

गजाननांचे समोर। आणिला पाटील भास्कर।बाळाभाऊनें समाचार ।अवघा समर्थांसी श्रुत केला।।२०।।
तो अवघा ऐकून । महाराज वदले हसून । हत्या, वैर आणि ऋण । हे कोणासी चुकेना।।२१।।

महाराज म्हणती त्याकारण । हेंच तुझे अज्ञान । अरे वेड्या जन्ममरण । हीच मुळीं भ्रांति असे ।।३५।।
जन्मे न कोणी, मरे न कोणी । हे जाणावया लागुनी । परमार्थाचा उपाय जाणी । शास्त्रकारें कथन केला ।।३६।।

संचित - प्रारब्ध - क्रियमाण । हें भोगल्यावाचून । या बध्द जीवा लागून । सुटका होणें मुळींच नसे।।३८।।
पूर्वजन्मीं जे करावें । तें या जन्मी भोगावे । आणि ते भोगण्यासाठीं यावें। जन्मा हा सिद्धान्त असे ।।३९।।

अध्याय १२ वा

राजे कित्येक भूमीवरी । आजवरी झाले तरी । जागा कशाची सरकारी । इचा मालक पांडुरंग ।।१४०।।

अध्याय १३ वा

एका रेतीच्या गाडीवरी । समर्थांची बसली स्वारी । तो गाडीवान झाला दुरी । महार होता म्हणून ।।३५।।
तयीं महाराज वदले तयास । कां रे खालीं उतरलास ? । आम्हां परमहंसास । विटाळाची बाधा नसे ।।३६।।

अध्याय १४ वा

अरे आत्महत्या करु नये। हताश कदापि होऊं नये। प्रयत्न करण्या चुकूं नये। साध्य वस्तु साधण्यास।।३८।।
आतां जरी दिलास प्राण । प्रपंचाशीं त्रासून । तरी येशील घेऊन । जन्म पुन्हां ते भोगावया ।।३९।।
नको जावुं हिमालया । गंगेमाजीं प्राण द्याया । परत आपुल्या घरीं जाया । वेळ वेडया करूं नको ।।४०।।

आतां तरी येथून । खर्च करावा सांभाळून । उगे न करी उधळेपण । त्यांत नसे सार कांहीं ।।५७।।
जन सुखाचे सोबती । निर्वाणीचा श्रीपती । त्याची सदैव करी भक्ति । तो न उपेक्षी कदा तुला ।।५८।।

अध्याय १५ वा

सज्जनास त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना । कंसाचा तो मनीं आणा । इतिहास म्हणजे कळेल।।८७।।

जेंव्हां स्वार्थाचा संबंध नसतो । तेव्हां न्याय आठवतो । हा जगाचा सिद्धांत तो। होईल खोटा कोठूनी ।।९४।।

अगणित करावें पुण्य । तेंव्हाच होतें येथें जनन । या भौतिक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असे ।।१३०।।
ते योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौतिकाला । योगशास्त्राहून भला । अध्यात्मविचार श्रेष्ठ    असे ।।१३१।।

अध्याय १६ वा

मग ते एकमेकांचे । काय गुरू होती साचे । नादी दंभाचाराचें । त्वां पुंडलीका पडूं नये ।।२७।।

अध्याय १७ वा

फार आग्रह करशील । तरी फजीत पावशील । याचा विचार करी खोल । मी न बोललो कांहींतरी ।।१९।।
दोरीसी दिधल्या फार ताण । मी मध्येंच तुटतसे जाण । मी न हलणार येथून । तूं या फंदात पडूं     नको ।।२०।।

अध्याय १८ वा

लोक सुखाचे सोबती । संकटकालीं अव्हेरिती । तेथें एक रक्षण करिती ।। संत अथवा देव हो ।।१६५।।

अध्याय १९ वा

मलीनता मनाठायीं । अंशेही राहिल्या पाही । त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा रे ! ।।९१।।
मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून । ऐशीं अंगे असती जाण । या भक्तिमार्गाला ।।९३।।
आत्मा अवघ्यांचा आहे एक । तेथें न पडे कदा फरक । शरीरभेद व्यावहारिक । त्याचें कौतुक कांहीं नसे ।।१०४।।
ज्याची निष्ठा बसेल । वा ! जो माझा असेल । त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरूर मला ।।१२७।।

मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तीत अंतर करूं नका । कदा मजलागी विसरूं नका । मी आहे येथेंच ।।३११।।

अध्याय २० वा

यामध्यें न कांही सार । धन भूचें भूमिवर । येतें मात्र बरोबर । पाप पुण्य मानवाच्या ।।२५।।
अभिषेक ब्राम्हण भोजन । हे पारमार्थिक आहे पुण्य । त्याच्यासाठीं वेंचितां धन । तें न जाय अनाठायीं ।।२६।।

निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव । उपास्यापदीं भाव । उपासकें ठेवावा ।।१७८।।

अध्याय २१ वा

व्देषी मन असूं नये । सन्नीतीला सोडूं नये । राजाविरुध्द जावुं नये । उगीच भलत्या कामांत ।।६६।।
साधु कोण संत कोण ? । हें पाहावें शोधून । दांभिकांच्या नादीं जाण । कदापिही लागूं नये ।।६७।।

आय पाहून खर्च करी । दंभाचार कधीं न वरी । साधुसंत येतां घरीं । विन्मुखे त्याला लावू नये ।।६९।।
अपमान खऱ्या संतांचा । झाल्या कोप ईश्वराचा । होतसे बापा साचा । संत चरणीं प्रेमा धरीं ।।७०।।

सन्नीतीला सोडूं नका । धर्मवासना टाकूं नका । शत्रु ना माना एकमेकां । तरीच शक्ति वाढेल ।।२१४।।